पारशिवनी (तालुका प्रतिनिधी) : –
ग्राहकांचे प्रश्न सोडविणे हा उद्देश दुय्यम असून ग्राहकांचे प्रबोधन करणे हाच मुख्य उद्देश असल्याचे मत अ.भा. ग्राहक पंचायत, पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रीय प्रमुख गजानन पांडे यांनी व्यक्त केले. तर संघटनेतील जुन्या पिढीने नवीन पिढीला तयार करण्याचे काम करावे असे गौरवोद्गार विदर्भ प्रांत सचिव नितीन काकडे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतच नागपूर जिल्हा अधिवेशन पारशिवनी येथील खळतकर सभागृहात दि. २२ जानेवारी रोजी दोन सत्रात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून गजानन पांडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन काकडे, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते, विदर्भ प्रांत उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, विदर्भ प्रांत प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे, जिल्हा सचिव प्रकाश भुजाडे, महानगर सचिव विलास ठोसर, माजी जिल्हाध्यक्ष गणेश शिरोळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, अधिकारी वजन माप विभागाचे अधिकारी वि.भा. झोटे, जिवक हगवने, औषध निरीक्षक मनीष चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. ग्राहक पंचायतीच्या निस्वार्थ आणि निरपेक्ष वृत्तीने आजवर केलेल्या अनेक कामांची माहिती देण्यात आली. ग्राहकांना बीलाचे चे महत्व, चौकस खरेदीचे महत्व आणि छोट्या छोट्या बाबी व्यवहारात किती महत्त्वाच्या असतात याची माहिती दिली. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. नानासाहेब निकम यांच्या अध्यात्मिक पुस्तकाचे प्रकाशन करून येथील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पारशिवनी संघटनेचे तालुकाप्रमुख नरेश उराडे यांनी तर आभारप्रदर्शन तालुकाध्यक्ष राजेश देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.




