गिरीश आंदे
सावनेर नगर परिषद हद्दीत घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडिया नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नगर परिषद क्षेत्रात अनेक प्रामाणिक करदाते असून काही अपरिहार्य कारणांमुळे व आर्थिक अडचणींमुळे अनेक नागरिकांचा घरपट्टी व पाणीपट्टी कर थकित राहिला आहे. या थकबाकीवर लावण्यात आलेल्या दंडामुळे एकूण रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली असून ती एकाच वेळी भरणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार वेळोवेळी थकित कर वसुलीसाठी ‘अभय योजना’ राबवून दंडाच्या रकमेत १०० टक्के किंवा ठरावीक टक्के सवलत देण्यात येते. अशी योजना सावनेर नगर परिषदेत लागू केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात थकबाकीचा भरणा करतील, ज्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ होऊन शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जनहितार्थ तसेच नगर परिषदेच्या आर्थिक हितासाठी थकित करधारकांसाठी तातडीने अभय योजना जाहीर करावी, अशी नम्र विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे यांच्यासह राहुल सावजी, मनोहर घोळसे, अनुप पठाने, वाहिद शेख, सूर्यकांत तलखंडे, कैलाश शर्मा, अशोक काळबांडे व पिंटू धानोरकर उपस्थित होते.




