गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक १३ मे २०२५ रोजी कळमेश्वर येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. या विशेष शिबिराचे आयोजन जनतेच्या विविध समस्या, गरजा आणि अडचणी शासनाच्या विविध विभागांमार्फत एका ठिकाणी सोडवण्यासाठी करण्यात आले होते. शासकीय सेवा लोकांपर्यंत थेट पोहोचाव्यात आणि नागरिकांनी विविध योजनांचा लाभ सहजतेने घ्यावा, हा या शिबिरामागचा मुख्य हेतू होता.
या शिबिरात कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, रोजगार, अन्न व नागरी पुरवठा, महसूल आणि ग्रामीण विकास आदी विभागांनी भाग घेतला. नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली, विविध योजनांसाठी अर्ज स्वीकारले गेले, तक्रार निवारणाची प्रक्रिया राबविण्यात आली, मोफत आरोग्य तपासणी, कृषी मार्गदर्शन, महिला बचतगटांची नोंदणी, रोजगाराबाबत मार्गदर्शन आदी सेवा देण्यात आल्या.
शिबिराला परिसरातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. प्रशासनानेही तत्परतेने त्यावर उपाययोजना सुचवून विश्वासाचे वातावरण निर्माण केले. या शिबिराने शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक बळकट करत जनतेच्या मनात विश्वासाची नवी पालिका निर्माण केली. कळमेश्वरसारख्या ग्रामीण भागात अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे या यशस्वी आयोजनातून अधोरेखित झाले.
या उपक्रमास राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक स्तरावर मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास मा. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, दिलीप धोटे, संदीप उपाध्ये, मीना तायवाडे, तसेच प्रगती मंडळ यांचे सक्रिय योगदान लाभले. याशिवाय, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल म्हस्के, उपविभागीय अधिकारी (SDO) संपत खलाटे, तहसीलदार श्रीमती रोशनी मकवाने आणि गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमास लाभली.




