मनोज गोरे (चंद्रपूर प्रतिनिधी)
गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी परिसरात वाघाने घुमाकुळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवडाभरात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून, काल अल्का पेंदोर या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आज गोंडपिपरीत प्रचंड तणाव निर्माण झाला.संतप्त जमावानी अहेरी – नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग तब्बल नऊ तास रोखून धरला.दरम्यान पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची मध्यस्थी आणि शेवटच्याक्षणी वनविभागाने दाखविलेल्या तत्परतेनंतर आंदोलनाचा समारोप होऊन अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
आज सकाळी सात वाजतापासून संतप्त नागरिकांनी अहेरी–नागपूर मार्ग रोखला.सुरजागडकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.व्यापाऱ्यांनी देखील मागण्यांना पाठिंबा देत गोंडपिपरी शहरातील संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद ठेवली.गोंडपिपरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होतांना दिसले.वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या मृतक महिलेचे प्रेत घटनास्थळावरून उचलण्यात आल्यानंतर जमाव आक्रोशित झाला. काल रात्री घटनास्थळी वनाधिकारी आणि स्थानिक आमदारांवरही ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता.त्याचवेळी संतप्त नागरिकांनी आरएफओ व एसीएफ यांना मारहाण केल्याची माहिती मिळाली.त्यामुळे आज आंदोलनस्थळी स्थानिक वनअधिकारी अनुपस्थित राहिले.
दरम्यान,वरिष्ठ पोलिस अधिकारी दिवसभर घटनास्थळी तळ ठोकून राहिले. दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले.त्याचवेळी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्वतः हजर होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.चर्चा सुरू असताना वाघाला जेरबंद करण्यासाठी शूटर टीम देखील दाखल झाली.ती गावाच्या दिशेने निघाली.दरम्यान आंदोलनासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गोंडपिपरीत एकवटले.आष्टी व कोठारीपर्यंत २५ ते ३० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस अधीक्षक यांच्यासमक्ष सहाय्यक उपवनसंरक्षक यांच्यासोबत आंदोलकांनी चर्चा केली.त्यात यशस्वी तोडगा निघून तणाव शमविण्यात सायंकाळीं पाच वाजता प्रशासनाला यश आले. वाघ पकडण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षेची ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून यावेळी करण्यात आली.




