गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
सावनेर–काटोल मुख्य मार्गावरील सावंगी ते तेलकामठी दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी खड्डे बुजवण्याचे काम केले असले तरी रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी, दुचाकी व चारचाकी वाहनांचा समतोल बिघडून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही, विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण होतो. हा मार्ग शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन वापराचा मुख्य रस्ता असल्याने सर्वच स्तरातील नागरिकांना या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे,या मार्गावरून अनेक राजकीय पुढारी नियमित ये-जा करतात, तरीही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.




