गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
सावनेर (तिष्टी)काटोल मुख्य मार्गावरील सावंगी ते तेलकामठी दरम्यानचा रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेला आहे. परिणामी, वाहनचालक, प्रवासी तसेच शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि कामगार वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळोवेळी खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येते, मात्र काही दिवसांतच डांबरी थर उखडून पुन्हा तोच खड्डेमय रस्ता तयार होतो. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे अधिकच धोकादायक ठरत आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, कळमेश्वर यांनी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित ठेकेदाराला तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले होते. मात्र आज १ नोव्हेंबरपर्यंतही काम सुरू झालेले नाही. ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
दरम्यान, या मार्गावरून अनेक राजकीय पुढारी नियमित ये-जा करत असतानाही दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “अधिकारी आणि राजकीय पुढारी फक्त फोटोसेशनपुरतेच काम करतात; पण रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि जनतेचे हाल त्यांना दिसत नाहीत,” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.




