मौदा (तालुका प्रतिनिधी)
‘वंदे मातरम’ सार्ध शताब्दी महोत्सवानिमित्त मौद्यातील श्री गजानन मंगल कार्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, खंड विकास अधिकारी डॉ. महेश बेहेकर, गटशिक्षणाधिकारी संकेत मरस्कोल्हे, जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल मेश्राम आणि प्रमुख वक्ते डॉ. रविशंकर मोर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यांमधील ५ हजार देशप्रेमी नागरिकांच्या सहभागाने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि कौशल्य विकास केंद्रांत देशभक्तीपर गीतगायन, वक्तृत्व, निबंध, पोस्टर आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्हे व बक्षिसे देण्यात आली.
शहरात तिरंगा झेंडे, घोषवाक्ये आणि देशभक्तीपर मिरवणुकीने वातावरण भारावून गेले. भंडारा युवक बिरादरीचे पथनाट्य प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात गाजले. ‘वंदे मातरम’ गीताच्या निर्मितीचा ऐतिहासिक संदर्भ देताना प्रमुख वक्ते डॉ. रविशंकर मोर यांनी सांगितले की, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७६ साली मलिकघाट येथे हे गीत लिहिले, ज्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली. तर पारतंत्र्यात असताना वंदे मातरम या गीताची रचना झाली, वंदे मातरम म्हणजे आईला वंदन अर्थातच भारत मातेला वंदन करताना उर भरून येत असल्याचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी अध्यक्षीय भाषणातून मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे सचिव पी. एन. कळंबे, सहायक आयुक्त (कौशल्य विकास) सुनंदा बजाज, समितीचे सचिव तथा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी.एन. कळंबे, बाबुराव बालपांडे, संदेश गणवीर, अनिल मेश्राम, सुनील धुसन, तुकाराम लुटे, पुरुषोत्तम ढगे, विनोद निकुडे, शिशुपाल डोंगरे, श्रीधर वडे, प्रफुल बरगटकर, आशिष सतदेवे, गौरी वैद्य, दिनेश ढोबळे, बिलास पाथेर, जनार्दन माथुरकर, धनंजय पाटील तसेच विविध शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहानी ढोबळे यांनी केले.




