गिरीश आंदे
दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारत या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचा ठाम निर्धार असल्याचे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य डॉ. राजीव पोतदार यांनी केले आहे.
राजकोषीय तूट कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भांडवली खर्चात करण्यात आलेली वाढ अत्यंत महत्त्वाची असून, यामुळे देशाचा जीडीपी वाढदर सात टक्क्यांपर्यंत कायम राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 75 हजार रुपयांवरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख रुपये केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आले असून, अनेक नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर आणि राष्ट्रीय महामार्गांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे देशातील दळणवळण सुविधा अधिक सक्षम होतील, असेही त्यांनी सांगितले.
लघुउद्योग व स्टार्टअप्ससाठी देण्यात आलेली प्रोत्साहनपर धोरणे औद्योगिक क्षेत्रातील वाढ आणि उत्पादकतेस चालना देतील. याशिवाय, मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वस्तीगृह उभारण्याची योजना ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
आरोग्य क्षेत्रातही पाच नवीन प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे उभारण्याचा संकल्प या अर्थसंकल्पात करण्यात आला असून, यामुळे आरोग्य सुविधांचा विस्तार होईल, असे डॉ. पोतदार यांनी नमूद केले.
2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पात दूरदृष्टीपूर्ण तरतुदी करण्यात आल्याचे सांगत, त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत या अर्थसंकल्पाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे.




